संगमनेर (प्रतिनिधी) –तालुक्यातील मालुंजे गावात गौण खनिज अर्थात मुरूम उत्खनन आणि वाहतुकीचा मोठा गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप समोर आला आहे. स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार, शासनाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर मुरूमाचे उत्खनन करून त्याची अवैध विक्री केली जात असल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाव परिसरातील काही भागांत रात्रीच्या वेळी जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने मुरूम उपसा केला जात असून, या कामात स्थानिक ग्रामपंचायतीतील एका पदाधिकाऱ्याचा सहभाग असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
गौण खनिजांच्या अवैध उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणीय हानीदेखील होत आहे. तसेच शेतजमिनींचे नुकसान, रस्त्यांची दुरवस्था आणि भूजल पातळीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वास्तव परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती महसूल आणि खनिकर्म विभागापर्यंत पोहोचल्याचे समजते. संबंधित ठिकाणांची तपासणी करून उत्खननाची सत्यता पडताळली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई होऊ शकते.
ग्रामपंचायत ही गावाच्या विकासासाठी आणि सार्वजनिक हितासाठी कार्य करणारी संस्था असल्याने अशा प्रकारच्या आरोपांमुळे गावाच्या प्रतिमेलाही धक्का बसत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी मालुंजे ग्रामस्थांनी केली आहे.





