वधूच्या शोधात असलेल्या वरपक्षाने सावध राहा! लग्नाच्या नावाखाली फसवणाऱ्या टोळ्या सक्रिय
नकली वधू, बनावट नातेवाईक आणि दलालांचे जाळे; लग्नानंतर दागिने व रोख रक्कम घेऊन पसार होण्याचे प्रकार वाढले
प्रवरातीर । वृतसेवा
संगमनेर | प्रतिनिधी :-विवाहयोग्य मुलांसाठी योग्य वधू मिळणे कठीण होत असल्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही फसव्या टोळ्या राज्यातील विविध भागांत सक्रिय झाल्याची गंभीर बाब समोर येत आहे. विशेषतः सिन्नर, जुन्नर, अहिल्यानगर जिल्ह्यासह संगमनेर परिसरात अशा प्रकारच्या फसवणुकीचे अनुभव अनेक कुटुंबांनी व्यक्त केले आहेत.
या टोळ्या स्वतःला वधूचे आई-वडील, नातेवाईक किंवा मध्यस्थ म्हणून सादर करतात. विवाहाची बोलणी करून वरपक्षाकडून दलाली, रोख रक्कम, दागिने किंवा इतर खर्च करून घेतात. काही प्रकरणांत विवाहही लावून दिला जातो; मात्र लग्नानंतर एक-दोन दिवसांत नववधू घरातून निघून जाते किंवा वादाचे कारण सांगून बेपत्ता होते. त्यानंतर तिच्यासोबत असलेले कथित नातेवाईकही संपर्क तोडतात. अशा प्रकारे त्याच महिलेचा वापर करून इतर कुटुंबांचीही फसवणूक केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
समाजात मुलींची कमतरता नसली तरी योग्य स्थळाच्या शोधात असलेल्या पालकांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याचे चित्र आहे. अनेक वेळा दलाल आधीच मोठी रक्कम घेऊन गायब होतात. त्यामुळे विवाह ठरविताना संबंधित कुटुंबाची सखोल चौकशी करणे, ओळखीच्या व्यक्तींमार्फत माहिती पडताळणे आणि आवश्यक असल्यास अधिकृत कागदपत्रांची खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे.
अशा प्रकारची फसवणूक झाल्याचा संशय आल्यास तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि जाणकारांनी केले आहे. विवाह हा विश्वासाचा विषय असल्याने घाईगडबडीत निर्णय घेण्याऐवजी संपूर्ण पडताळणी करूनच पुढील प्रक्रिया करावी, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रकारच्या घटना विविध भागांत समोर आल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्येक प्रकरणाची सत्यता संबंधित पोलीस तपासानंतरच निश्चित होते. त्यामुळे सर्वसामान्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता पडताळणी करूनच निर्णय घ्यावा येवढे मात्र खरे – संपादक.






Total Users : 191795