संगमनेरातील बस स्टॅन्ड. शाळा कॉलेज परिसर असुरक्षित : नशेखोरांचा हैदोस!!
प्रवरातीर । वृतसेवा
संगमनेर प्रतिनिधी-शहरातील वाढती नशाखोरी, सार्वजनिक ठिकाणी होणारा उपद्रव आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर आयोजित समन्वय बैठकीत व्यापारी, सामाजिक संस्था, प्रवासी संघटना आणि नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली. शहरातील बसस्थानक, शाळा, महाविद्यालय परिसर तसेच गर्दीच्या भागात नशेखोरांचा वाढता वावर नागरिकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
व्यापारी वर्गाने पोलिस प्रशासनाला थेट प्रश्न विचारत, “शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना सुरक्षित वातावरण कधी मिळणार?” असा सवाल उपस्थित केला. विशेषतः महिलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे अनेकांनी सांगितले.
बैठकीत अल्पवयीन मुलांमध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीनतेबाबतही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. काही युवक दुसऱ्या तालुक्यांतून तसेच ऑनलाइन माध्यमांतून अमली पदार्थ मिळवत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे समाजात व्यसनाचे प्रमाण वाढत असून त्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
बसस्थानक परिसरात प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रवासी संघटनांनीही सुरक्षेचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. बसस्थानकात पोलिस गस्त वाढविणे, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करणे, संशयितांवर त्वरित कारवाई करणे आणि नियमित तपासणी मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी शहरातील शाळा व महाविद्यालय परिसर ‘ड्रग्जमुक्त क्षेत्र’ घोषित करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती अभियान राबविणे, पालक, शिक्षक, पोलिस आणि सामाजिक संस्थांनी संयुक्तपणे व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करावेत, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
बैठकीच्या शेवटी संबंधित यंत्रणांनी नशाखोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, संशयितांवर कठोर कारवाई करणे आणि शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले. नागरिकांनीही संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने पोलिसांना देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.






Total Users : 191800